Total Page-Views

Monday, December 1, 2025

रितेपण


आताशा आकाशातील रंगोत्सव 

 

मनाला तशी भुरळ घालत नाही

 

चुकार डोळे कुठे तरी ढगांची  

 

काळपट किनारच शोधत असतात..

 

गच्च हिरवाईचं जंगल तुडवताना

 

वानप्रस्थाश्रम आठवुन जातो उगाचच..

 

मग भकास डोळ्यांनी पाहत जातो 

 

उमलत्या फुलांवरील चंचल फुलपाखरं 

 

क्षणभंगुरतेची पाल मात्र चुकचुकत असते..

 

गोधुलीनं थरथरती सांज काळवंडताना 

 

पक्षी घराकडे थव्याने उडत जाताना..

 

मला रिकामं घरटं आठवत चर्र होत जातं

 

 

 

 

-प्रशांत 

 

सहज सुचलं म्हणुन..

 परवा गीतरामायणमधील एक गाणं ऐकत होतो आणि अचानक strike झालं की, राम-लक्ष्मण , ज्यांच्या अजोड बंधुभावाची गोडवी सारा हिंदुस्थान गातो , आजही आदर्श म्हणुन पाहतो ते दोघं सख्खे भाऊ नव्हे तर सावत्र भाऊ होतेतिकडे महाभारतात धर्म-भीम-अर्जुन हे तिघं नकुल-सहदेव द्वयीचे सावत्र भाऊ होते!!पण रामायणात असो वा महाभारतात , कुठेही त्या भावांच्या नात्यात सावत्र म्हणुन किंचितही खोट नव्हती!! 

मग वाटतं, या पार्श्वभुमीवर भावा-भावातील (ते पण सख्ख्या) भांडणं (ज्याला आपण भावकी म्हणतो अथवा भाऊबंदकी) कधीपासून सुरू झाली असेल? इतिहासात याची पहिली नोंद केंव्हा झाली असेल? (आणि मी हिंदू भावांची भांडणं म्हणतोय. मोघल राज्यकर्त्यातील भावकी सत्तेसाठी ते भावांना, जन्मदात्याला ठार मारुन सिंहासन बळकावत , हे तर सर्वश्रुत आहेच!) 

आजच्या काळात तर वडिलोपार्जित इस्टेट एक मोठं राज्य असो , मोठी कंपनी असो वा अगदी एक गुंठा जमीन; सख्ख्या भावांत वितुष्ट , आज ना उद्या , येत असतंच.. (वाटण्या झालेल्या असल्या तरी) कडाक्याचं भांडण होत नसेल अथवा कोर्ट-कचेरी पर्यंत जात नसेल पण अबोल्याचं शीतयुद्ध असतंच बहुधा घरोघरी!! ..आणि त्याच वेळेस चुलत/मावस/मामेभावंडाबद्दलचा प्रकर्षानं दाखविला जाणारा उमाळा..!!) 

मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क (भावांबरोबर) मिळण्याचा कायदा झाला आणि घरोघरी एका नव्या भांडणाला तोंड फुटलं! यावर जास्त काही बोलता एवढंच म्हणेन की आता -याच बायकांची माहेरं दुरावली, …पोरांची आजोळं दुरावली!! 


नात्यांचे स्नेहरज्जू नाहीसे होतायत.. माणसं एकाकी बनत चाललीयत!!                                                                  Technology मुळे सारं जग जवळ आलं असलं तरी ‘water, water everywhere but not a drop to drink’ अशी समुद्रात अडकलेल्या माणसासारखी स्थिती झालीय!! 

 

 

-प्रशांत 

 

अडगळीत पडलेले शब्द

 मराठवाडा(मुख्यत्वे धाराशिव,लातूर)/सोलापुर ग्रामिण भागात वापरात असलेले (किंबहुना, केंव्हा तरी लहानपणी माझ्या कानावर पडलेले वा कधी काळी वापरलेले) कांही शब्द वानगीदाखल नमूद करतोय. (अर्थ सांगून / वाक्यात उपयोग करून. बरेच शब्द उर्वरित महाराष्ट्रातही वापरात असतील). गतस्मृतींना उजाळा नागरी पिढीस कांही नव्या शब्दांची ओळख होईल या उद्देशाने


पाचुंदा - कडब्याच्या धाटांची पेंढी

पेंड - गाई/म्हशी/बैलांना खाऊ घालण्याचा पदार्थ , जो तेलघाण्यातील by-product असतो.

कडबाकुट्टी - गुरांना चारा देण्यासाठी कडब्याचे बारीक तुकडे करण्याचे यंत्र 

कणिंग - धान्य साठवण्यासाठी बांबूचे बनवलेलं दंडगोलाकार मोठं पात्र (अशी कणिंग, धान्य पाखडायची सुपे, डाल, दुरड्या वस्तू बनविणा-या कारागिराला बुरूड म्हणत असत

गुम्मी - लहान कणिंग 

शिंकाळे - स्वयंपाकघरात टांगलेली विणलेली टोपली (ज्यात लोणी किंवा दह्याचं मडकं/सट अथवा कांदे/लसूण ठेवत

वाफसाजुन महिन्यामधे पहिल्या पावसानंतर पेरणी करण्यायोग्य झालेली शेतजमीन (गरम तापलेल्या नांगरलेल्या जमीनीवर जेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा जी वाफ निघते त्याला वाफसा म्हणतात

वांबाळ पडली - वांबाळचा शब्दकोशातील अर्थ मळभ, ढग दाटून येणे असा आहे. पण व्यवहारात मात्रपाऊस पडून गेल्यानंतरचा हवेतील गारवा; थंडी पडलीया अर्थाने वापरतात

दिवस कासराभर वर आला - सुर्योदय होऊन बराच वेळ झाला . (कासरा - गाई-म्हैस-बैलाच्या गळ्यात बांधलेला दोर , ज्याने जनावर दावणीला बांधले जाते

कालवड - गाईचे वासरू (स्त्रीलिंग

बारदाना - हा शब्द सामान्यतः बैल-बारदाना या रूपात वापरला जातो. म्हणजे किती बैलं, गाई-म्हशी आहेत, धान्य किती होतं या अर्थाने. (In general, a term to denote agricultural assets of a farmer). याचा दुसरा अर्थधान्य साठवायची पोतीअसाही आहे

बळद - धान्य साठवण्याची मोठी जागा/कोठडी, घान्यागार, कोठार  

ढाळज- पडवी/ बैठकीची खोली 

वेळा अमावस्या - हा सण (ज्याचं मूळ उत्तर कर्नाटकात आहे) मराठवाडा आणि सोलापुर या भागांतील शेतकऱ्यांचा एक कृषिप्रधान सण आहे. या दिवशी शेतात कडब्याची खोप करून 'शेतातल्या लक्ष्मीची' पूजा केली जातेआंबील उंडे यांचा नैवेद्य दाखवला जातो

पाणंद - गावाच्या बाहेरील/ओढ्याजवळील अरुंद/चिंचोळा रस्ता (अपभ्रंश - पांद

डहाळा - कोवळा हरभरा 

राकुळ- लहान गावांत घरच्या गाय/म्हशीला गावातील गायरानात चारून आणण्यासाठी एक माणूस असायचा (जो सकाळी गाईला घरातून नेईल संध्याकाळी परत आणुन सोडेल ) . त्याला राकुळ म्हणतात. (गुरे राखणे वरून राखुळ/राकुळ असा शब्द आला असेल

घोंगडं - लोकरीचं blanket ( जे उबदार असतं पण मऊ नसतं

फणेरपेटी - फणी वगैरे ठेवण्याचा बायकांचा makeup box.

घंगाळे - स्नानासाठी वापरायचे पात्र (तांब्याचे/जस्ताचे

दादरा - जीना 

दिवस शाळू झाला - हिवाळ्यात दिवस लहान होतो , त्या अर्थाने 

परस , परसाकडे जाणे (म्हणजे शौचास जाणे या अर्थाने ) . पण कालौघातपरसाकडे जाणेया क्रियेचं परसाकड असं चक्क सामान्यनामात रूपांतर झालं! (म्हणजेपरसाकड लागली!’) 

अनुशापोटी - उपाशी पोटी (एखादं औषध सकाळी काही खाता घेणं . अनशन वरून अनुशापोटी आलं असावं

नम्म होणे - मऊ पडणे (पोळी /भाकरी / पापड . सर्द हवेने मऊ पडणे

धान्य मोजण्याची मापं/एककं - (जी आता जवळपास कालबाह्य झाली आहेत) चिपटं, कोळवं , शेर, पायली , मण 

उखळ / पहार - शेंगदाण्याचे कूट करण्यासाठी वापर व्हायचा 

(सध्याचा संततधार पाऊस पाहुन गावाकडील एक म्हण आठवली ..”मघा आणि चुलीपुढे हागा’ ! :-) ..कारण मघा नक्षत्रात पडणारा संततधार पाऊस..! याच्यावरून आणखी काही म्हणी आठवल्या. ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’, ‘पडला हस्त तर शेतकरी होईल मस्त’, ‘नाही पडल्या उत्तरा तर भात मिळेना पित्तरा!’) 

 

आणखी काही असेच वैशिष्ट्यपूर्ण शब्द (मराठवाड्यातील) आठवले तर सुचवा..! (आणि हो, तुम्ही किती शब्द प्रथमच ऐकले?)

 

 

 

-प्रशांत 

Sunday, November 16, 2025

Corporate Governance and the pivotal role of Independent Directors

https://boardstewardship.com/?r3d=vol-3-issue-8-november-2025#44 


(Published by Board Stewardship - Nov’25)



राधा

दै. दिव्य मराठी मध्ये  प्रकाशित - १३ ऑक्टोबर  २०२०.
(कविता वाचण्यासाठी image वर क्लिक करा)




 

Sunday, October 12, 2025

आठवणींचा kaleidoscope (३)

१९८१-८२ ...  जिल्हा परिषद प्रशाला, तुळजापुर. गाव तेंव्हा खुप लहान होतं. आज दिसते तशी गर्दी बिलकुल नव्हती. १०वी चं शालेय वर्ष सुरु होतं. माझा अभ्यास जोरात सुरू होता. Prelim. exam. (सराव परीक्षा!)मधे मला ८९% टक्के मार्क्स पडले  होते. मी  लिहिलेला  मराठी निबंध आमच्या . . प्रयाग सरांनी वर्गात साऱ्या  मुलांसमोर  वाचून  दाखवून माझं खूप कौतुक  केलं होतं; मी राज्यात पहिला  (किमानपक्षी बोर्डात तरी) येईन अशी त्यांना ( थोडीशी  मलाही) अपेक्षा होती! वार्षिक परीक्षा  जवळ आली  होती. मला आठवतंय, रंगपंचमीच्या दुस-या  दिवसापासून परीक्षा  सुरु  होणार होती. पहिला  पेपर  मराठीचा होता. मी  रंग-पंचमीदिवशी सालाबादाप्रमाणे रंग खेळता (! 😊) घराच्या  माडीवरून  अभ्यास करता-करता खाली रावळगल्लीत रंग-पंचमीचा  चाललेला जल्लोष पाहत होतो! मराठीचा  तसाही  अभ्यास  काही फार नसतो; आपला अभ्यास  झालेला आहे, असं वाटून आश्वस्तही होतो!

परीक्षेचा  दिवस  उजाडला. मी  देवाच्या, आईच्या पाया पडून निघालो. शिंदे  हायस्कुल मध्ये नंबर आला होता. Hall ticket वगैरे दाखवून वर्गात बसलोघंटा वाजली, पेपर हातात पडला.आणि  कसं  कोण  जाणे , पण  मी आधी निबंध लिहिण्याचं  ठरवलं! आता विषय आठवत  नाही पण एवढं  लख्ख आठवतंय  कि अगदी  खनपटीला बसलो होतो की, काही  तरी  फार  भारी  उपमा , अलंकार , दोन ओळींच्या यमकात बसणा-या सुरेख काव्यपंक्ती सुचतील... पण  कसलं काय! इतर वेळेसअगदी  हुकमी कविता लिहिणारी माझी  प्रतिभा  (?!) माझ्यावर पुर्णत: रुष्ट  झाली  होती. (नाही; मी लेखक /कवी  नाही  याची  मला  पूर्ण  कल्पना आहे; पण  त्या  condition ला  'writer's block' म्हणतात हे मला - वर्षांपूर्वी  कळलं!)असा बराच  वेळ गेला असेल  प्रतीक्षेत; अर्ध्या-पाऊण  तासाने  मला  जरा  भान  आलं, "प्रशांत, आता  काही  तरी खरडून निबंध  पूर्ण  कर बाकीचे  प्रश्न सोडवायला घे लवकर".. भरभर  लिहून  सर्व प्रश्न attempt केले ; पेपर संपला

माझं  मन  सांगत  होतंच की पेपर काही  चांगला  गेला  नाही.. पण  ते  फारसं मनाला  लावून घेता बाकीचे पेपर्स  दिले; छान  गेले होते

Result लागला! गुण-पत्रिका  हातात घेतली, मराठीत फक्त ६० मार्क्स  पडले होतेज्याच्यामुळे बाकीच्या विषयात खूप चांगले मार्क्स पडूनही (गणित १४९/१५०, इंग्रजी ८९/१००, विज्ञान  १४०/१५०)  average ८५% झाले. जे  नक्कीच माझ्या अपेक्षेपेक्षा  खूप कमी होते. राज्यात पहिला  काय,बोर्डात  पहिल्या

३० विद्यार्थ्यातही आलो  नव्हतो! नाराज  नक्कीच  झालो  होतो  पण निराश नाही!

..आता चार दशकानंतर मागे वळून पाहताना वाटतं; झालं ते  बरंच  झालं!चुकून-माकून आपण  राज्यात १०वे-१२वे  आलो  असतो  (इथेही  मी  पहिला  वगैरे  म्हणत  नाही हं 😊) तर ते यश  मला  झेपलं  असतं कामाझे  पाय जमिनीवर  राहिले असते का? दहावीतील  यशाने  हुरळून  जाऊन मी १२वीला आपटी  खाल्ली  असती का

हे  थोडंसं  "द्राक्षे  आंबट  आहेत" असं  म्हणण्यासारखं आहे याची मला  कल्पना  आहे.  But if I understand myself correctly, may be, I was not that level-headed in my childhood so it was a blessing in disguise!

(खूप वर्षानंतर, अमेरिकेत  सिलिकॉन व्हॅली  मध्ये, न्यूयॉर्क मध्ये वगैरे SAP projects मधे काम  करताना कळलं की बोर्डात आलेल्या (अगदी पहिला ) वा  IIT/IIM मधून  pass out झालेल्याना शिंगे नसतात, ते  आपल्या  सारखेच असतात आणि  त्यांच्या तुलनेत आपण स्वतःला जेवढे समजत होतो तेवढेहीगल्लीतले बॅट्समननाही आहोत! किंबहुना, -याच बाबतीत सरसही

..असो! तर दहावीच्या परीक्षेतील अपेक्षा-भंगाचं दुःख काही दिवसातच मागे  पडलं  होतं. आता ११वी/१२वी  साठी  तुळजापूर  सोडून  बाहेर पडायचं होतं. डॉक्टर किंवा  इंजिनियर (तेही Govt college मधुनच) असे  दोनच पर्याय  असण्याचा  काळ (आणि मध्यमवर्गीय परिस्थितीहोता तो! सोलापूर खुणावत होतं.. (तेंव्हा ते महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचं मोठं शहर होतं!) 

आणि जून १९८२ च्या पहिल्या आठवड्यात माझ्या मोठ्या भावाबरोबर  (कै. प्रफुल्ल) आम्ही सोलापूरला जाण्यासाठी एस.टी. पकडलीगादीची वळकटी, टपावर ठेऊन  आणलेली जुनी सायकल, प्लॅस्टिकची मोठी बादली  आणि छोटी सुटकेस (   प्रयाग सरांनी  'शाळेत पहिला  आला म्हणून बक्षीस' दिलेल्या ५१ रुपयातून  घेतलेली) हा जामानिमा घेऊन सोलापूर बस-स्टॅण्ड वर उतरलो!…

घर सोडून  होस्टेल मध्ये राहायचंय, सोलापुरातील हुशार मुलांबरोबर स्पर्धेत निभाव लागेल का, याबद्दल मनात थोडी भीती होती, हुरहुर होतीआणि डोळ्यांत स्वप्नं!! 

 

 

 

-प्रशांत