Published in ‘Corporate Citizen’ magazine (April’25 issue) -
https://corporatecitizen.in/v10-Issue11/corporate-insight-management-conundrum-of-it-startups.html
You could be a corporate newbie, a senior leader or a homemaker; you would certainly gain something positive from this blog. Objective is to share knowledge, insights, experiences. No fluff, real stuff! Click on the topics / hyperlinks of your interest under ‘Categories’ in top-right corner of the blog.
Published in ‘Corporate Citizen’ magazine (April’25 issue) -
https://corporatecitizen.in/v10-Issue11/corporate-insight-management-conundrum-of-it-startups.html
एक महिना लोटलाय;
मी ते घरटं
(व ती चिमणी
) दररोज एकदा तरी
पाहतोय..
या काळात बरंच
काही घडलंय. चिमणीने
घरट्यात अंडं घातलं
असणार. एके दिवशी
जेंव्हा घरट्यातून क्षीण
चिव-चिव आवाज
ऐकू येऊ लागला,
चिमणी घरट्याकडे खूप
वेळा येऊ लागली
तेंव्हा कळलं, पिल्लू
झालंय! चिमणी सकाळी
साधारण ९ च्या पुढे घरट्याकडे
यायची, मग चोचीतून
चोचीमध्ये भरवायची पिल्लाला. (मला
आधी वाटलेलं , आळी
भरवत असेल! प्रोटीनयुक्त
आहार! नंतर काही
दिवसांनी कळलं, चिमणी
आधी exora च्या फुलावर
बसून परागकण टिपते
व ते चोचीतून
भरवते! सकाळी ११/११-३०
पर्यंत चिमणी १५-२० वेळा
तरी आलेली असेल
पिल्लास भरवायला! पिल्लू
मात्र सकाळी ८ पासूनच तिची
वाट पाहायचा चिवचिवाट
करायचं. (मला ते
गाणं आठवलं 'पक्षिणी
प्रभाती चारियासे जाये,
पिल्लू वाट पाहे
उपवासी'!)
काल चांगलाच जोराचा अवकाळी
पाऊस आला आणि मी उगीचच
disturbed..त्या पावसाच्या तडाख्याने जास्वंदाच्या
छोट्या फांदीवरचं ते
घरटं खाली पडलं
तर, या काळजीने!
पण ईश्वराची लीला
म्हणा, चिमणाबाईंचं मजबूत
घरटं बांधण्याचं कौशल्य
म्हणा, तसं वाईट
काही घडलं नाही
सुदैवाने! (कारण मी
आज सकाळी उठल्या-उठल्या आधी
ते घरटं पाहिले,
चिवचिव ऐकली आणि
हुश्श वाटलं!)
पिल्लाची ३-४
आठवड्यात वाढ झाली
असेल किंवा चिमणीने
कालच्या पावसाचा भविष्यातील
धोका ओळखला असेल,
काहीही असो पण आजच ते
पिल्लू हळूच घरट्यातून
बाहेर पडून फांदीवर
बसलं. चिमणी आलीच
लगेच. खाऊ घालायला
असेल वा कौतुक
करायला असेल वा उडायचं शिकवायला
असेल! ५-१० मिनिटे त्या
फांदीवर बसून जग बघितल्यानंतर पिल्लाने हळूच
जवळच्या दुसऱ्या फांदीवर
झेप घेतली! तिथे
परत ५-१० मिनिटे बसून
पुढची मोठी झेप!!
आता इकडे घरटं
रिकामं आहे..
…Empty nest !!
-प्रशांत
पहिली कविता कोणत्या
भाषेत लिहिली गेली,
केंव्हा लिहिली गेली,
किंबहुना आधी गद्य
आले की पद्य,
हे नक्कीच संशोधनाचे
विषय असतील. ऋग्वेद
१५००-१००० BCE काळात
लिहिले गेले असं
म्हणतात. मराठीमध्ये मुकुंदराज यांनी
११८८ मध्ये 'विवेकसिंधू'
लिहिले , जे मराठीतील
आद्य साहित्य मानले
जाते. आपल्या सर्वसामान्य
माणसांच्या जीवनात बालपणी
कानावर पडलेली पहिली
कविता (बडबडगीत)असेल
"काव काव ये,
चिव चिव ये"
, जेंव्हा आई येन-केन-प्रकारेण
बाळाला जेऊ घालण्याचा
प्रयत्न करत असते
तेंव्हा! 😀तसेच १९७५
नंतर जन्मलेल्या पिढीतील
बालकांनी रात्री "लिंबोणीच्या झाडामागे"
ही अंगाई नक्कीच
ऐकली असेल!
..तर सांगायचा मुद्दा हा
की आपल्या मराठी
मनावर कवितेचे एवढ्या
लवकर व खोलवर संस्कार झालेले आहेत!
आता अश्या सर्वव्यापी
कवितेची व्याख्या वगैरे
(परीक्षेत २-३
गुण मिळवून देणारी
) सांगायची गरज आहे का? पण
तसं केल्याशिवाय लेखाला
भारदस्तपणा कसा येईल
बरे :-?
तस्मात मला रुचलेल्या
काही व्याख्या द्यायचा
मोह टाळत नाही..
“Poetry is criticism of life; poetry is appreciation of
life.”- Matthew Arnold
“Poetry lifts the veil from the hidden beauty of the
world and makes familiar objects be as if they were not familiar.” – Shelley
“Poetry is when an emotion has found its thought and the
thought has found words.” – Robert Frost
"शब्दांनी
घडविल्या गेलेल्या प्रतिमांची सेंद्रिय
रचना म्हणजे कविता
होय.” - सुधीर रसाळ
या थोरा-मोठ्यांच्या
मांदियाळीमध्ये gate-crashing करण्याचा अस्मादिकांचा प्रयत्न
- "विधात्याने स्त्री निर्माण
केली आणि आपल्याच
अद्भुत निर्मितीकडे तो
अनिमिष नेत्रांनी पाहतच
राहिला..अन् त्याला
पहिली कविता स्फुरली!"
१२व्या शतकापासून सुरु झालेला
मराठी कवितेचा प्रवाह
अव्याहत वाहतोय. पंत
काव्य, संत काव्य,
तंत काव्य हे
त्या काव्य-प्रवासातील
मैलाचे दगड असावेत.
वृत्तात,मात्रांत व यमकात अडकलेल्या मराठी काव्य-सुंदरीला मुक्तछंदाने मुक्त
केले, आणि मग ‘ट ला
ट, री ला री , जन
म्हणे काव्य करणारी’
या आरोपातून मुक्त
होऊन समस्त कवींनी
(आणि कवयित्रींनी) लेखण्या
नवनवोन्मेषाने सरसावल्या. मग मात्र
महापुरच आला नां मराठी कवितेला
!(त्यात स्मार्टफोन/समाजमाध्यमांची
भर!!). "कविता उदंड
जाहल्या" वा "कवितांचा महापूर
आणि मी एक पूरग्रस्त" असं म्हणायची
पाळी आली असेल
बऱ्याच दुर्दैवी वाचकांवर!
(त्या 'महापुरात' अस्मादिकांचेही
दोन-तीन ओहोळ
सामील असतील बरे
का ! ")
संवेदनशीलता,
भावना यांनी प्रतिभेने
व्यक्त होणे म्हणजे
कविता. कविता करत
नसतात , कविता प्रगट
होत असते असं
कुसुमाग्रज म्हणतात. दुर्बोध काव्याबद्दल
त्यांचं मत "जेंव्हा
कवीच्या भावना अस्पष्ट
असतात , तेंव्हा कवितेत
दुर्बोधता येते." (संदर्भ - प्रतिभा
आणि प्रतिमा, दूरदर्शन)
जाणीवांपेक्षा
नेणीवांवर भर असतो
अशा काव्यात, असं
मज पामराचं मत!
नानाविध भावना नेमक्या
टिपणारे शब्द , नादमाधुर्य
आणि कुठेतरी खोलवर
भिडत जाणारा आशय
... भा रा तांबे
, बोरकर , विंदा , कुसुमाग्रज , गदिमा,
शांता शेळके, पाडगावकर
, सुरेश भट , ना धों महानोर
यांच्या सकस , समृद्ध
काव्यावर पोसलेला आमचा काव्यपिंड..!
कवीच्या मनात जो काही भावनांचा
कल्लोळ होतोय , जे
काही तरी त्याला
मनोमन वाटतंय , ते
त्याच्या कोणत्याही सामान्य वाचकास
त्या कवितेद्वारे नेमके
पोहोचणे (to use a technical
term – ‘without any transmission loss’) यालाच
खरे तर कवीच्या
प्रतिभेचे यश म्हणावे
लागेल! नाही तर उगीचच abstract art प्रमाणे कवीला याओळीत
नेमकं असं म्हणायचे
असेल की तसे, का काही
वेगळाच अर्थ ध्वनीत
करायचा आहे,.. ही
बिचाऱ्या वाचकांची चिंता!
आजकालचे बरेच नवकवी
ग्रेसांच्या graceful गूढतेचं अंधानुकरण करताना
वाचकांना मात्र शब्दबंबाळ
करतात! ("मला झोपायचंय
हिमालयाची उशी घेऊन!"
)
काही जण एकच
एक भाव (उदा:
प्रेमभंग / एकाकीपण / नागरी मध्यमवर्गियांची
दु:खे) त्यांच्या
ब-याच कवितांतून
व्यक्त करताना दिसतात.
अर्थात, कविता काय
असावी वा त्यातून
काय व्यक्त करायचे
आहे , ही पुर्णतः
वैयक्तिक बाब आहे.
पण वाटतं, की
फक्त करडया रंगाशिवाय
त्यांनी सृष्टीत , आसमंतात
व्यापून राहिलेल्या सप्तरंगांची
दखल घ्यावी. नव्हे
तर, सप्तरंगांची उधळण
करावी आपल्या काव्यांजलीतुन!
जे काही भलं-बुरं आपल्या
आसपास , समाजात , देशात/विदेशात घडतंय , ते
कुठे तरी कवितेत
यायला हवे, ती संवेदनशीलता असावी, ती
नाळ जिवंत असायला
हवी. कवितेचे नानाविध
प्रकार लीलया पेलता
येतील असं समृद्ध
शब्द-भांडार (आणि
अनुभव भांडार) हवं.
काव्य एकसुरी वाटू
नये.
नानाविध अनुभवांचे , संवेदनांचे कंगोरे
प्रतिभेच्या कानशीने घासून सौदामिनीसारखे
लख्ख प्रगटून वाचकांचे
चक्षू (वअंतर्चक्षू) दिपून
जावेत..... ते काव्य!!
ना धों महानोरांच्या
निधनानंतर सांप्रत मराठी काव्यविश्वात
खरोखरच एक मोठी पोकळी निर्माण
झाली आहे. आहेत;
कवी/कवयित्री भरपूर
आहेत, अगदी घरोघरी
आहेत (त्यात अभिनेत्री-cum-कवयित्री या वर्गाची
भर पडली आहे)
, पण त्या कविता
मनास भिडत नाहीत.
(किंबहुना त्या convent मधून शिकलेल्या
मराठी नवसाक्षर युवा-पिढीसाठी आहेत असंच
वाटतं मला!)
यात भर म्हणून
आता Artificial Intelligence ने काव्यलेखनाचं
यांत्रिकीकरण केलंय. म्हणजे
काय, तर तुम्ही
कोणताही विषय द्या
(उदा: प्रेम) व
ते AI tool तुम्हाला एका मिनिटात
ती कविता करून
देते! तुम्हाला नाही
आवडली ,तर परत करून घ्या
.. आवडेपर्यंत!
आता याच्या मुळे
नजीकच्या भविष्यात गीतकारांवर नक्कीच
संकट येऊ शकते.
..आणि तुम्ही एखादी
चांगली कविता लिहिलीत
तरी "AI tool वापरून केली
असेल" असा आरोप
तुमच्यावर होऊ शकतो!
१२०+ वर्षांपूर्वी केशवसुतांनी लिहिलेल्या
या काव्यपंक्ती मात्र
कालौघात काहीशा अर्थ
हरवुन बसल्या आहेत..
“आम्हांला
वगळा – गतप्रभ झणी
होतील तारांगणे,
आम्हांला वगळा – विकेल
कवडीमोलावरी हे जिणे!”
-प्रशांत
एक छोटीशी चिमणी
जास्वंदाच्या झाडाच्या एका फांदीशी
झोंबत होती, खूपदा
त्याच फांदीवर येत
होती. २-३ दिवसांनी मला कळलं
की घरटे बांधणे
चालू आहे!
वसंत ऋतू आलेला
आहे; नवचैतन्याचा ,सृजनाचा
निसर्गोत्सव! पावसाळ्याआधी घरटे बांधून
पिल्लास जन्म देण्याचं
नियोजन असावं चिमणीबाईंचं!
(का ते चिमणराव
असतील लग्नाआधी 1BHK ready करणारे:-?)
कुठून-कुठून शोधून
नेमक्या स्वरूपाची काडी
, काटकी , कापसासारखं तंतुमय असं
काही तरी आणि बरंच तत्सम
building material चोचीत पकडून आणायचं
व ते कमालीच्या
चातुर्याने विणत / गुंफत
घरटे बांधायचं! आणि
हे असं ८-१० दिवस
उडत-उडत बांधकाम
पूर्ण करत असताना
एक कान (?) सदैव
धोक्याकडे (पक्षी - माणूस , दुसरा
पक्षी , मांजर इ.)
कडे ठेवायचा; जरा
खुट्ट वाजलं की
भुर्रकन उडून जायचं,
धोका नाही आहे
याची खात्री झाली
की परत येऊन
'काम चालू'!
वाटलं, पक्षी आपल्या
पिल्लांना उडायला शिकवतात,
हे माहित होतं.
पण असं घरटे
बांधायला शिकवत असतील
का? की ते कौशल्य उपजतच
असतं?
पक्ष्यांचं
homing instinct तर केवळ विस्मयकारक
असतं. बहुसंख्य पक्षी
आपल्या घरट्याच्या ४-५किलोमीटर परिघात (माझा
अंदाज बरं का!)
बागडतअसतील व संध्याकाळी
आपापल्या घराकडे परतत
असतील. पण सैबेरियातील
, कझाकस्तानातील हिमवर्षावाची जीवघेणी थंडी
टाळण्यासाठी तेथील पक्षी
(उदा: फ्लेमिंगो) हजारो
किलोमीटरअंतर कापून भारतासारख्या
उष्ण हवामानाच्या प्रदेशात
अॅाक्टोबर ते मार्च
दरम्यान येतात (पुण्याजवळील
भिगवणमधे आगमन असतं
हजारोंचं) व कांही
महिन्यांनंतर परत (जेव्हा
तिकडची थंडी कमी
होते) हजारो किलोमीटर
अंतर कापत आपल्या
मायभूमीकडे / घराकडे जातात.
दिशेचं भान , रोज
किती अंतर कापता
येईल , कोठे /कोणत्या
झाडावर मुक्काम करायचा
, हे सगळे करताना
रोजच्या अन्नाचीही तजवीज
करायची! आणि हे सगळं अग्निदिव्य
दरवर्षी स्वेच्छेने करायचं!!
या नियोजनासाठी केवढा
तरी हुशार मेंदू
लागत असेल नां?
…आणि मग, इंग्रजी
मध्ये bird-brained idea (म्हणजे मूर्ख
कल्पना) हा शब्दप्रयोग
कसा काय आला असेल याचंच
आश्चर्य वाटू लागतं!!
-प्रशांत
१७व्या शतकाच्या प्रारंभीची वर्षे; हिंदुस्थानात यवन स्थिरावलेत, त्यांची पुंडाई वाढलेली आहे, मोठ्या प्रमाणावर
हिंदूंना बळजबरीने धर्मांतर
करायला
भाग
पाडले जात आहे, मंदिरं लुटली जात आहेत, पाडली
जात आहेत आणि महाराष्ट्र प्रांतातील प्रजा मात्र सगळं काही
दैवावर
सोडुन निवृत्तीमार्ग स्वीकारत गप्प
बसून
आहे!
..आणि या अश्या बिकट परिस्थितीमध्ये इ.स.१६०८ मध्ये जांब या गावी ठोसर
कुटूंबात एक ओजस्वी नररत्न जन्म
घेते, जे पुढे जाऊन 'महाराष्ट्र-धर्म'
काय आहे ते
सांगते, 'प्रपंच करावा
नेटका'
असे ठणकावते व 'यत्न तोचि
देव
जाणावा'
असे सुनावते ...
.. ते द्रष्टे, कालातीत, एकमेवाद्वितीय संत श्री समर्थ रामदास स्वामी!
समर्थानी त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि
भारतीयांचे वैयक्तिक जीवन
जवळुन अनुभवले आणि त्या मानवी जीवनाच्या सूक्ष्म निरीक्षणावर आधारीत कसदार साहित्त्याची निर्मिती केली. त्यात मनाचे श्लोक, दासबोध, रामायण, आत्माराम, करुणाष्टके, स्फुट श्लोक, मनोबोध, लघुकाव्ये, अभंगे, पदे, ललिते, आरत्या, इत्यादींचा समावेश आहे. परंतू या सर्व साहित्यात 'दासबोध' हा ग्रंथ प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधणारा;
प्रयत्नवाद, जीवनव्यवहार, आणि भक्तीमार्ग यांचा समतोल साधणारा असा ग्रंथशिरोमणी मानला जातो. समकालीन प्रचलित असलेला भक्तिमार्ग, ‘निवृत्तिमार्ग व ‘प्रपंच पराङ्गमुखता यांचा पगडा समाजावर घट्ट बसलेला असताना समर्थांनी प्रयत्नवादाचा केलेला भक्कम पाठपुरावा त्यांच्या विपुल साहित्यात ठायीठायी आढळतो. त्यांचे प्रयत्नवादाचे विचार नक्कीच काळाच्या कैक वर्षे पुढे होते!
“यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे” असे म्हणून प्रयत्न आणि परमेश्वर हे एकच आहेत याची जाणीव पहिल्यांदा समर्थांनी भारतीय समाजाला करून दिली. 'यत्नाचा लोक भाग्याचा । यत्नेवीण दरिद्रता', 'करील यत्न जीतुका । तयास लाभ तीतुका ॥' ते प्रयत्नवादाचे पुरस्कर्ते होतेच ; पण दैववादाचे खंडनकर्तेही होते! 'कर्मरेखा, कपाळीची रेघ, प्रयत्नाने पुसता येते' असा समर्थाचा सिद्धांत आहे. ते म्हणतात, ' रेखा तितुकि पुसोन जाते। प्रत्यक्ष प्रत्यया येते।' (दासबोध १५-६-९) आणि ती रेखा पुसण्यासाठीच ते सांगतात की प्रयत्न ,साक्षेप, विवेक, बुद्धियोग इ. गुणांची आवश्यकता आहे.
प्रयत्नवादाची संकल्पना विशद करताना सुरुवातीला समर्थ एक गोष्ट सांगतात. एक दुर्दैवी व करंटा माणूस जो आळशी व खादाड होता, कर्जबाजारी होता, धड खायला नव्हते, जेवायला नव्हते, अंगावर घ्यायला वस्त्र नव्हते, अंथरायला नव्हते, पांघरायला नव्हते, राहण्यास झोपडी नव्हती, सोयरे वा मित्र नव्हते. तो विचारतो, “स्वामी, मी काय करू? कोणती आशा जीवाशी धरू? कसे जगू”? (दासबोध १२-९)
त्याला उत्तर देताना समर्थ म्हणतात -
लहान थोर काम काही । केल्यावेग़ळे होत नाही । करंट्या
सावध पाही । सदेव होसी (१२-९-६)
अंतरी नाही सावधानता । यत्न ठाकेना पुरता । सुखसंतोषाची
वार्ता । तेथे कैची (१२-९-७)
म्हणोंन आळस सोडावा । यत्न साक्षेपे जोडावा । दुश्चित्त पणाचा मोडावा । थारा बळे(१२-९-८)
समर्थ सांगतात की काम कोणतेही असो ,लहान किंवा मोठे, ते करावे लागते. ते काम चांगले होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो .त्यासाठी मनात दक्षता घ्यावी लागते ,सावधानता ठेवावी लागते ,सावधानता नसेल तर शेवटपर्यंत प्रयत्न होत नाहीत .दीर्घ प्रयत्न झाला नाही ,तर सुख संतोष होत नाही .म्हणून माणसाने आळस सोडावा ,चिकाटीने प्रयत्न करावा ,मन निराश होऊ देऊ नये ,मन मागे फिरू देऊ नये .त्यासाठी जीवन पध्दती कशी असावी ते समर्थ सांगतात:
प्रात:काळी उठत जावे । प्रात:स्मरामि करावे । नित्य नेमे स्मरावे । पाठांतर । । १२-९-९
सकाळी लवकर उठावे, उठल्यावर भगवंताचे स्मरण करावे, पूर्वी पाठ केलेल्याची उजळणी करावी ,नवीन पाठ करण्याचा नियम करावा, निर्मळ होऊन देवपूजा करावी, मग फलाहार करावा, व्यवसाय करताना कोण आपला आहे आणि कोण आपला नाही, हे नीट ओळखून काम करावे. सर्व ठिकाणी सावधानता ठेवून नीतिमर्यादा पाळावी. लोकांना त्रास होणार नाही या पद्धतीने काम करावे, मनन, चिंतन करावे माणसाने आपले मन प्रसन्न ठेवून आत्मसुधारणेच्या मागे लागावे. आळस टाकून प्रयत्न करावा. काही झाले तरी प्रयत्नांची कास सोडू नये. प्रयत्न करताना, काम करताना आजूबाजूच्या लोकांना खूश ठेवावे. कोणाचे मन दुखवू नये. लोकांमध्ये वावरताना आपले बोलणे आणि वागणे यात फरक नसावा नाहीतर लोक आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील.कोणाला काही विचारायचे असल्यास थोडक्यात पण नेमकेपणाने विचारावे ,सांगताना पाल्हाळ लावू नये ,कोणतेही काम दुस-याला पसंत पडेल असे करावे ,आपल्याकडे येणा-याचे समाधान करावे ,बुध्दी चे सामर्थ्य वाढवावे असे समर्थ म्हणतात निरपेक्षपणे प्रयत्नपूर्वक कार्य करीत राहिल्यास कर्मयोग्याचे गुण आपल्या ठिकाणी येतात व प्रारब्धही अनुकूल होते.
माणसाने प्रयत्न करताना तसेच प्रत्येक ठिकाणी (प्रपंचात, व्यवहारात) आपली बुद्धी वापरली पाहिजे. एका अकलेवाचून या जगात दुसर्या कशाला महत्त्व नाही. म्हणून अक्कलहुशारीने प्रयत्न केला पाहिजे.
अकलबंद नाही जेथे ।
अवघेचि विश्कळीत तेथे।
येके अकलेवीण तें। काये आहे ॥ (१२.९.२८)
अशा रीतीने वागल्यास करंटेपणा शिल्लक राहणार नाही
पण प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही,
समर्थ सांगतात की भक्तांनी क्रियाशून्य, आळशी बनू नये. देव सदा सर्वदा सानिध्य आहे. अल्पधारिष्ट्याने पाहा, चांगली कामे कर. कामे करता करता देवाच्या कृपाळूपणाचा अनुभव येत राहिल. ("सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।")
समस्तामध्ये सार साचार आहे
कळेना तरी सर्व शोधूनि पाहें (मनाचे श्लोक - ७५)
सर्व यशस्वी जीवनाचे सार म्हणून काय असेल तर श्रमावरील निष्ठा. आचरणास प्राधान्य देणे. साचार म्हणजे सदाचरण हे भक्तिमार्गातील आधारभूत तत्त्व आहे. पुढे ते असेही म्हणतात की जीवनात ध्येय असावे पण ते मोठे असावे. (मना अल्प संकल्प तोही नसावा। याच्यावरून 'Not failure but low aim is crime!' हे आठवते)
प्रयत्नवादाच्या संदर्भात समर्थांच्या दासबोधातील आणखी काही मौक्तिक-पंक्ती -
मनी धरावे ते होते।विघ्न अवघेचि नासोन जाते। कृपा केलीया रघुनाथे । प्रचित येते । (६.७.३०)
आळसें निद्रा वाढली।आळसें वासना विस्तारली।आळसें
सुन्याकार जाली!सद्बुद्धी निश्चयाची। (८.६.३४)
कष्टेविण फळ नाही। कष्टेविण राज्य नाही । केल्याविण होत नाही । साध्य जनीं । (१८.७.३)
आपली दुःखे, आपले अपयश, आपले दारिद्र्य यांचे खापर
दैवावर, प्रारब्धावर फोडावयाचे व त्या सबबीखाली आपले अवगुण, आपला आळस, आपला गलथानपणा
झाकुन ठेवायचा, या दैववादी लोकांच्या प्रवृत्तीवर समर्थांनी तीव्र टीका केली आहे.
(दासबोध, १२-२) ते म्हणतात, संसारात एक सुखी होतो, एक दुःखी होतो. याचे कारण सांगताना
लोक 'प्रारब्धावरी घालिती.' आपल्या हातून अचूक यत्न होत नाही, म्हणून आपल्याला यश येत
नाही, आपल्या ठायी अवगुण आहेत, म्हणून 'केले ते सजेना,' हे लोक जाणत नाहीत. 'दुसऱ्यास
शब्द ठेवणे, आपला कैपक्ष घेणे, पाहों जाता लौकिक लक्षणे, बहुतेक ऐसी.' आपल्या पराभवासाठी
दैवाला, नाही तर दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरण्याचीच बहुतेकांची वृत्ती असते. पण
हे सर्व चूक आहे. आपण पुरेसा प्रयत्न करत नाही, योग्य दिशेने प्रयत्न करत नाही, हेच
खरे कारण असते. गुण अनेकांच्या ठायी असतात, पण योग्य प्रयत्न नसेल तर त्यांचा उपयोग
काय ? 'जेवरी चंदन झिजेना । तंवरी सुगंध कळेना.' त्यामुळे इतर वृक्ष व चंदन हे सारखेच
ठरतात. म्हणून माणसाने झिजले पाहिजे. 'येत्न सिकवण' या समासात (१३,९) समर्थांनी हाच
विचार मांडला आहे.
समर्थ सांगतात, ‘रेषा तितुकी पुसोन जाते’म्हणजे या नशिबाच्या रेषा नाहीशा होतात, बदलतात; पण केंव्हा, तर आळसाला थारा न देता माणसाने सतत नेटाने प्रयत्न करीत राहिले, तर दैवही त्याला अनुकूल होऊ लागते. समर्थ म्हणतात, “प्रयत्न करीत असताना माणसाने सावधगिरी बाळगली पाहिजे. तेथे सावधानता, सजगता नसेल तर प्रयत्न नीट होत नाही. यासाठी माणसाने आळस सोडुन चिकाटीने प्रयत्न करावा. प्रयत्न करीत असताना काही वेळा मन साशंक होईल, काही वेळा निराश होईल, तरीही मनाला निर्धाराने (साक्षेपाने) प्रयत्न करायला लावावे. मनातील साशंकता, नैराश्य बाजूला ठेवून प्रयत्न करावा.”
आणि असा प्रयत्नवाद चोखाळून यश संपादन झाले तर ते डोक्यात जाऊ नये, 'मी'पणाचा गर्व होऊ नये, अहंकाराची बाधा होऊ नये म्हणून समर्थानी एक अत्यंत मौलिक सिद्धांत सांगितला आहे.
रघुनाथ स्मरोनि कार्य करावे ।
ते तत्काळचि सिद्धी पावें।
कर्ता राम हे असावें। (६.७.३३)
जे सर्व आहे ते भगवंताच्या मालकीचे असून आपण केवळ त्याचे विश्वस्त म्हणून काम करायचे आहे असे मानून कार्य करत राहावे . ‘भगवंत कर्ता व आपण फक्त विश्वस्त किंवा माध्यम’ हे एकदा पक्के मानले की मग गर्वाचा प्रश्नच उरत नाही! (यात त्यांनी गीतेचे सार विलक्षण सहजतेने गुंफलेले आहे!)
थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातुन पाहिले तर, श्री समर्थ रामदासस्वामीना ‘भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक’ असे नक्कीच संबोधता येईल! 'मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा' यानुसार माणसे जोडावीत आणि सांघिक/एकत्र
काम करून
समाज-संघटन/राष्ट्र-उभारणीचे महान कार्य पूर्णत्वास न्यावे म्हणणारे समर्थ नेतृत्वाचे, एकसंध समाज-निर्मितीचे, राष्ट्र-निर्मितीचे
धडे देतात १७व्या
शतकात! त्यांनी निर्माण केलेले देशातील ११०० मठ हे समर्थांच्या संघटन कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. सर्वसामान्यांचा
व्यक्तिविकास असो
वा राजनीतीतील नेतृत्व, दासबोध
(आणि खास करून दासबोध /येत्नशिकवण १२.९) आपणास खूप काही शिकवतो.
आजच्या काळातील व्यवस्थापनशास्त्रातील मान्यवरांना , स्टार्टअप्स किंवा यशस्वी व्यक्तींना पण त्यात स्वकर्म, उद्योगशीलता, साक्षेप (मनाचा दृढ निर्धार, निश्चय) , सावधपणा ही मोलाची चतुःसूत्री मिळेल. याशिवाय संभाषणकला, व्यक्तिमत्त्वविकास , people-skills इ. शी निगडित अशी अनेक प्रेरणात्मक विचार-रत्ने आढळतील. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आजची युवापिढी; जी समाज-माध्यमांवर आपला बहुमोल वेळ विनाकारण खर्च करत असते व येन केन प्रकारेण झटपट श्रीमंत होण्याची दिवास्वप्ने पाहत असते, त्यांच्यासाठी तर हे झणझणीत अंजन ठरावे!
श्रीसमर्थ रामदास स्वामींचा प्रयत्नवाद आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. श्री समर्थांच्या जीवनात प्रज्ञा आणि श्रद्धा, कर्म आणि संन्यास , परोपकार आणि अनासक्ती, एकांत आणि लोकसंग्रह यांचा समतोल संगम साधल्याने त्यांचे जीवन सत्पुरुषांनासुद्धा आदर्शवत आहे! मानवी जीवनातील समस्यांवर प्रारब्ध मानुन गप्प न बसता प्रयत्नांनी मात करता येते. "कर्मेवीण नसे समाधी" या त्यांच्या विचाराचा आजही मोठा अर्थ आहे. ‘प्रयत्न, परिश्रम आणि शुद्ध आचरण’ यांची सांगड घालूनच जीवन सुखी होऊ शकते ही त्यांची शिकवण आजही सार्थ ठरते.
..आणि यामुळेच ३५०+ वर्षांपूर्वी लिहिलेले समर्थांचे साहित्य केवळ पोथीनिष्ठ, धार्मिक न राहता अक्षर वाड.मय ठरते, या २१व्या शतकात, संगणकाच्या / कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence)च्या युगातही कालानुरूप ठरते आणि यातच श्री समर्थ रामदासस्वामींचे एकमेवाद्वितिय स्थान अधोरेखित होते!
जय जय रघुवीर समर्थ ।
-प्रशांत पिंपळेकर